पुणे : ‘हरिजन बना देते हैं, बहुजन बना देते हैं, बस जन नहीं बन पाते..’ हा ‘आर्टिकल १५’ या चित्रपटातील हृदयस्पर्शी संवाद समाजातील प्रखर वास्तव डोळ्यासमोर आणतो. सर्वच क्षेत्रात प्रगती करत असलेला आपला देश अजूनही अशा विचारात अडकलेला आहे, हे पाहून मन खिन्न होते,’ ही प्रतिक्रिया आहे विखे पाटील मेमोरियल शाळेत आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीची.
‘जातीव्यवस्थेवर खरमरीत भाष्य करणारा आणि त्यावर विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. आपल्या संविधानाने आपल्या नागरिकांना ठोस अधिकार प्रदान केले आहेत; परंतु प्रत्यक्षात त्याचा वापर केला जात नाही, हेच यातून प्रकर्षाने जाणवते,’ असे भाष्य बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केले.
जात, लिंग, धर्म, वंश भेद या गोष्टींचा स्पर्शही न झालेले मुलांचे भावविश्व असते. त्यांना वास्तवाची जाणीव व्हावी, त्यांच्यामध्ये समाजभान निर्माण व्हावे आणि त्यांनी यात बदल घडवावा, या उद्देशाने, विखे पाटील मेमोरियल स्कूलने आठवी ते बारावीतील सुमारे ५८० विद्यार्थ्यांना आणि २५ शिक्षकांना ‘आर्टिकल १५’ हा चित्रपट दाखविला. हा चित्रपट बघून व्यथित झालेल्या विद्यार्थ्यांनी परखड शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
सीबीएसई अभ्यासक्रमाच्या ‘सामाजिक अभ्यास व संवर्धन’ या विषया अंतर्गत हा उपक्रम राबविला गेला. मुख्याध्यापिका मृणालिनी भोसले यांच्यासह उपमुख्याध्यापक अमोल पाटील, समस्त शिक्षक व इतर वरिष्ठ समन्वयकही या वेळी उपस्थित होते. यासाठी सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉलने शाळेसाठी या चित्रपटाची तिकिटे सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली होती;तसेच शाळेसाठी तीन पडदे राखून ठेवले होते.
याविषयी अधिक माहिती देताना मृणालिनी भोसले म्हणाल्या, ‘सीबीएसईने विषय संवर्धनाचे काही उपक्रम प्रस्तावित केले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर या उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना या चित्रपटाचे मूल्यांकन इंग्रजी, मराठी, फ्रेंच आणि नागरिक शास्त्र या विषयांसाठी लिहावे लागेल. मुले संवेदनशील असतात, त्यामुळे या चित्रपटातील त्यांना जाणवलेल्या बाबी ते ठळकपणे व समर्पक शब्दांत मांडू शकतील,’ असा विश्वास वाटतो.